Saturday, October 3, 2020

कोरोना, कंगना आणि काळजातले काही...

 

माय डियर देशा..!!

गुड नाईट.. अरे हो, बरोबरच ऐकतोयस तू.. हो ना बाबा गुड नाईटच बोललोय..!

हो.. हो.. ठाऊक आहे तू झोपणार नाहीयेस पण आम्ही तर झोपतोय ना! खरंतर 'झोपलेलो'चं आहोत आम्ही. मग तिकडे काहीही होऊ दे तुझं आणि तुझ्यातल्या त्या 'आमच्यांचं'..!!

छ्या.. एवढं काय टेंशन घेतोयस तुही राव..  काय म्हणतो?  गेल्या चोवीस तासात 95 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालीये.. इट्स ओके रे. तू कशाला त्यांची काळजी करत बसतो बाबा. अरे या परिस्थितीतही  ' बूम बूम ' करत विदाऊट मास्क ट्रिपल सीट जाणारे तरुण बघशील तर तुझ्यातही थोडी 'एनर्जी' संचारेल बघ.. अरे एवढे 'शेर-दिल' नागरिक तुला भेटलेत, त्यांचा तुला खरं तर अभिमान वाटायला हवा आणि तू बाबा उगाच त्यांची काळजी करत बसतोस.. बी फ्रेश देशा.. "मानसिकतेचा आंतरिक ' इम्युनिटी' वर फरक पडतो.." परवा कुठल्यातरी टाम-टूम व्हाट्सअप ग्रुप ला वाचलं मी हे..

काय म्हणतो.. कोरोनामुळे तासाभरात सरासरी 48 लोक आपलं मौल्यवान जीवन गमवायला लागलेत?

काय राव तू पण? तिकडे त्या रिया - कंगनाच काय होतंय त्यात इंटरेस्ट आला असतानाच तू अशा 'सॅड' न्यूज देतोस.. अरे! न्यूज हवी कशी... इंटरेस्टिंग कम ब्रेकिंग..!! " क्या काला जादू करती थी रिया चक्रवर्ती?" बघ तुलाही इंटरेस्ट आला नसतं हेडिंग ऐकून. अरे, यासाठी दोन दिवस न्युज चॅनल्स समोर जाऊन बसलो होतो आम्ही,  काला जादु बद्दल तर काही समजलं नाही पण कोणत्यातरी चैनल चा टीआरपी मात्र वाढला म्हणे! असो आपल्याला काय घेणं त्याच्याशी.. 'जस्टिस फॉर सुशांत' महत्त्वाचं!

काय म्हणतो.. रेवती बच्छाव ला 'जस्टीस' कसा मिळणार?

मिळेल की.. पण एक्सक्युज मी कोण रे ही रेवती बच्छाव..?? tweet वगैरे केले का तिने एवढ्यात काही..?

देशा सॉरी बर का, बरं तू आठवण करून दिलीस.. रेवती बच्छाव..  नाशिकची ती.. आई-वडील मजुरी करतात; त्यात घरात एकच मोबाईल आणि भावंडे तीन! आता तू सांग ना एवढं महत्त्वाचं बारावीच्या वर्ष आणि अभ्यास ऑनलाईन करणं शक्य आहे का एकाच मोबाईलवर.. तिघांना!

अभ्यास करणे अपूर्ण राहील या भीतीने आत्महत्या केली म्हणे तिने.. सो सॅड.. पण तिने साधं tweet केलं असतं तर प्रश्न सुटला असता.. खरं ना रे... अरे, एका tweet वर कंगनाला Y+ सुरक्षा व्यवस्था मिळाली.. मग एक साधा मोबाईल नसता का दिला सरकारने रेवतीलाही.. माहिती नसेल तुलाही की आतापर्यंत फक्त 15 लोकांना ही Y+ सुरक्षा मिळते आहे. नक्की, भविष्यात आता कंगनावरही सिनेमा निघेल बघ, तोही लवकरच... रेवतीबद्दल बोलूया पुन्हा कधी तरी...

उत्तर प्रदेश, हाथरस मध्ये घडलेल्या घटनेबद्दल बघ, काही पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन किती तडकाफडकी करून टाकलंय.. पटापट 'जस्टिस' मिळतोय ना..!!

काय म्हणतोस.. "खरंच दोष त्यांचाच होता का? त्यांना ऑर्डर सोडणारे मोकाट कसे? त्यांच्यावर नको का कार्यवाही?"

खूप प्रश्न विचारतोस बाबा तूही... एवढे प्रश्न तर आम्हालाही पडत नाही सहसा... झालं त्यात, तेवढ्यात.. समाधान मानायची सवय पडून गेलीय आम्हाला आता.. तेही विथाऊट अर्गुमेंट.. असेही अर्गुमेंट करणाऱ्यांचे हाल पाहिले आहेत आम्ही... तेव्हा शांत हो तूही.. कशाला बीपी वाढवून घ्यायचा या कोरोना काळात... उगाच अजुन रिस्क..!!!

आपल मस्त आयपीएल च्या मॅचेस बघायच्या.. या बलात्कार, अत्याचार, भ्रष्टाचारी बातम्या बघण्यापेक्षा... तुला सांगतो त्या दिवशी त्या राहुल तेवठीयाने काय सिक्स मारले... रात्रभर त्याच्या घरच्यांना लोक फोन करून अभिनंदन करत होते.. वैतागून शेवटी स्विच ऑफ केला त्यांनी मोबाईल...

काय म्हणतो... मला कोणी सांगितलं हे?

अरे न्यूज ला आले होते की हे.. हो हो... सद्ध्या या अशाच बातम्या खूप व्हायरल होऊन जातात हं...

काय म्हणतो जुलै-ऑगस्ट महिन्यात सॅलरी क्लासमधल्या 81 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्यात...?

नाही बाबा, असं तर काही वाचण्यात, ऐकण्यात आल नाही एवढ्यात.. हा.. पण तू म्हणतो त्यात पॉइंट असू शकतो.. कारण बरेच मित्रमंडळी व्हॉटसअप ग्रुप वर बायोडाटा पाठवत असता बरका हल्ली...

पण तुला कस समजलं रे हे सर्व.. तुलाही कुणी केलाय का फॉरवर्ड बायोडाटा..? बाय द वे तुझा व्हॉट्सअँप नंबर काय आहे रे ?

काय..!! तुला व्हॉट्सअँप ची गरज नसते लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायला...? ग्रेटच आहेस मग तू तर...

बरं काय बोलत होतास मघाशी तू... ते नोकऱ्या गेल्या त्याबद्दल...?

दोन महिन्यात 81 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्यात... कसं सुरू असेल त्यांचं घर? बँकवाले लोन साठी काय काय हाल करत असतील त्यांचे? त्यांच्याकडे मुलांना ऍडमिशन घ्यायला पैसे असतील? भाड्याने राहणारे कसं करत असतील आता? किती दिवस असं जगू शकणार ते?

देशा, तू पण ना फारचं इमोशनल होतोय रे.. अरे लोकांची कुठे काळजी करत बसतो तू.. स्वतःची काळजी कर, ते बारक्या डोळ्यांचे चायनीज लोक कधीही वार करतील अशी परिस्थिती आहे..

त्यात तुझं आपलं सारखं चाललंय की 81 हजार लोकांच्या नोकऱ्या केल्या.. काहीही सांगतो राव तुही.. हे शक्य नसेलच..  इथे रोज न्यूज बघतो आम्ही.. सुशांत, रिया, कंगना, बीएमसी, ड्रग्स या व्यतिरिक्त दुसरं खरच नाही रे काही असं एवढं 'सिरीयसं'..

काय म्हणतो आहेस, बाकी जी-20 देशांमध्ये तुझी परिस्थिती अतिशय संवेदनशील आहे होय कोरोना संक्रमणबाबत आणि अर्थव्यवस्थेचे ही हाल झालेत असं म्हणतोस..

आता तूच म्हणतो आहेस तर असं असेलही, तरीपण मीही जरा निवांत वेळ मिळाला की क्रॉस चेक करून बघेल पण त्याआधी ऐैक ना, एक अंदर की बात सांगतो...

आधी आधी आपल्याकडे फक्त नोकरी लागावी म्हणून वशिला लागायचा.. आता हॉस्पिटल ला बेड मिळावा म्हणूनही वशिला लावावा लागतोय हं.. अरे, एवढंच नाही तर औषधांसाठीही आणि आता आता तर अंत्यसंस्कारासाठीही वशिला नाही लावला तर दोन दोन दिवस मृतदेह पडून राहतोय बाबा तसाच.. आम्ही तर एका नगरसेवकाकडे सेटिंग करून ठेवली आधीच.. कुणास ठाऊक कधी गरज पडेल?

काय म्हणतोस, सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय मग? त्यांनी जगायचं कसं? हॉस्पिटल्स, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन त्यांना कसा मिळेल?

देशा, पुन्हा तेच..! फारच सिरीयस होतं राहतो तुही, जाऊ दे ना.. तुला नसेल झोप येत कदाचित पण मला येतेय... बाय द वे गुड नाईट...!!

- अमोल जगताप




No comments:

Post a Comment